शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

तू सुखकर्ता....तू दुःखहर्ता...

तू सुखकर्ता ...तू दुःखहर्ता ..                             गेल्याच आठवडय़ात आमच्या घरी गणेश जयंतीनिमित्त माघी गणपती आला होता. आम्ही सर्वानीच हा गणेश जयंती उत्सव मोठ्या दिमाखात व थाटामाटात साजरा केला.दोन दिवस आम्ही सर्वजण एका वेगळ्याच विश्वात रममाण होऊन आनंदाने नाचत बागडत होतो.तसेच 
एका वेगळ्याच धुंदीत सगळीकडेच वावरत होतो.

 कित्येक दिवसानंतर आम्ही सर्व नातेवाईक व मित्र मंडळी ( जवळचे आणि दुरचे )ऐकमेकांस भेटून आप आपल्या सुख दुःखाच्या गप्पा गोष्टींत रंगून गेलो होतो.आपले राग रुसवे पार विसरून गेलो होतो.प्रत्येक जण  आपआपली कला कौशल्य दाखवत होती.जसे कोणी स्वयंपाक करण्यास पुढे पुढे करीत होती तर कोणी बाजारात जाऊन भाजी पाला आणण्यास धावत होती तर कोणी गणपतीची मूर्ती पाटावर बसवण्यात मश्गुल होती.तर काहीजण मूर्तीचे डेकोरेशन करण्यात मागेपुढे पहात नव्हती.जिकडे तिकडे प्रत्येक जण काम करण्यास उत्सुक होता.

कसलीच आदळआपट वा कोणाची किरकिर  नव्हती. कोणीच कामात टाईमपास करत नव्हता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद व हास्य निर्माण झाले होते..जणूकाही अशी काही स्पर्धा होती.. "जिकडे कमी तिकडे आम्ही " सर्वत्र गणरायाचा जयघोष चालू होता.वातावरणांत सुगंध व सुगम संगीत दरवळत होता. कोणीही मदत करण्यास तत्पर होता.....कोण घरमालक आणि कोण पाव्हणे  काहीच समजत नव्हतं.आमचा गणपती आता सार्वजनिक झाला होता.

प्रत्येकास वाटत होते कि आमच्या घरचा गणपती आहे व त्याप्रमाणेच वावरत होता. सकाळ संध्याकाळ आरती सुरू आणि रात्री जेवणाची तर   फारच मज्जाच आली. पोट तृप्त होऊन भजनास सज्ज  झालो.. . कारण कोणतेही वाद्य वा मृदुंग नसताना सुद्धा घरातील डब्यावर  ताल धरून गात होतो.महिलामंडळ तर फारच पुढे होते.एक गवळण संपली कि दुसरी चालू.मग काय गजराचा जयघोष पुरूष आणि महिला एका तालात गात होती..पण अधूनमधून दुधात हळद टाकून मस्त पैकी गरम गरम दुधाचा ग्लास फिरत होता.गणपतीची सेवा करण्यात प्रत्येकास आनंद घेत होता.जणू काही असे म्हणायचेय ...

" तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
तूच कर्ता आणि करविता,
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया।

ओंकारा तू, तू अधिनायक,
चिंतामणी तू, सिद्धीविनायक,
मंगलमूर्ती तू भवतारक,
सर्वसाक्षी तू अष्टविनायक,
तुझ्या कृपेचा हात मस्तकी,
पायी तव मम चिंता,

देवा सरू दे माझे मी पण,
तुझ्या दर्शने उजळो जीवन,
नित्य कळावे तुझेच चिंतन,
तुझ्या धुळीचे भाळी भूषण,
सदैव राहो ओठांवरती,
तुझीच रे गुणगाथा,

आम्ही सर्वजण एकाच घरात गुण्यागोविंदाने नांदत होतो.पण ही सुद्धा वेळ जाणार होती आणि झालं सुद्धा तसेच....लगेच दुसरा दिवस सुरू झाला व हा ना हा म्हणता...गणपती विसर्जनाची घटका जवळ आली.  सामानाची आवराआवर सुरू झाली आता आम्हांस गणपतीचा  निरोप घ्यावा लागणार. सुखानंतर दुःखाची झालर दिसत होती...कारण  गणपती संध्याकाळनंतर  आपल्या पुढील प्रवास निघणार...

झालं मग काय, पळापळ आणि धावपळ सुरू..गाडीत बसायला शर्यत सुरू..गणेश घाट केव्हा आला ते समजलचं नाही...आरती करून  देवास साकडे घातले कि सर्वाचे भल कर..सर्वानाच उत्तम आरोग्य व धनदौलत दे....मनातील ईच्छा पुर्ण कर....आणि शेवटी एकच मागणं....तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
तूच कर्ता आणि करविता,
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया।


लेखन कौशल्य-उदय माळगांवकर.

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ